Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- सोमय्यांचे हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप
- हसन मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या
- शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा
सोमय्या यांनी पुन्हा एकदा मोठ्या आवेशात ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.
‘मुश्रीफ हे मंत्री आहेत व कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे. कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता,’ असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.
वाचाः ‘मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी’
‘ईडीशी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अंहकार आहे. आमची वर सत्ता आहे, आम्ही काहीही करु शकतो, अशी भाषा चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करु ही त्यांची नियत आहे व महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार एकदम भूतकाळात गेले व म्हणाले, त्या काळात अनेकदा वाद झाले. मृणालताई असताना सदनामध्ये अनेकदा वाद व्हायचे, पण ते राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असलेला पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते. पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचाः कराडमधील ‘ते’ ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि…
‘एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. एकतर ते ‘ईडी, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत. या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडेल असे त्यांचे वर्तन आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
दुसरे एक गंभीर विधान पाटलांनी केले. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही. पाटील म्हणतात तसे हे स्किल माजी मंत्री म्हणून त्यांच्याकडे आहे व याबाबतची ‘पीएच.डी.’ त्यांनी केली असावी. त्यामुळे ‘ईडी’ने पाटील व इतर माजी मंत्र्यांच्या पैसे खाण्याचा हिशेब एकदा घ्यायला हवा व आधीच्या सरकारातील मंत्र्यांच्या तोंडास फेस आणायला हवा, असा खोचक टोला लगावला आहे.
वाचाः ‘त्या’ १७ कोटींचा हिशेबच नाही!; अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या
‘स्वतः फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे प्रशासन त्यांना माहीत आहे. ज्या प्रशासनाकडून त्यांनी कारभार केला तेच प्रशासन आजही आहे. पुन्हा प्रशासनातले अधिकारी विरोधी पक्षनेत्यांना गोपनीय रीतीने भेटत असतात हा स्फोट त्यांनीच केला आहे. मग ऊठसूट ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या धमक्या का देता? केंद्रीय तपास यंत्रणांचा हा दुरुपयोग नाही, तर काय? महाराष्ट्रातील मंत्र्यांवर, सरकारवर आरोप करणाऱ्याला केंद्र सरकार लगेच ‘झेड’ दर्जाची केंद्रीय सुरक्षा पुरवून स्वतःचेच हसे करून घेते. सत्य असे आहे की, ‘ईडी’मुळे कोणाच्या तोंडास फेस येतोय की काय ते नंतर पाहू, पण महाराष्ट्राचे ठाकरे सरकार ‘केंद्रीय’ जोर लावूनही पडत नाही म्हणून येथील विरोधी पक्षाच्या तोंडास आलेला फेस स्पष्ट दिसत आहे,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.