Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. प्रबळ दावेदार ठरेल असा तिसरा उमेदवार रिंगणात नाही. मधल्या काळात इतर अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांसोबतच नीलेश लंके आणि ‘एमआयएम’चे परवेज अशरफी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. यावरून लंके समर्थकांनी विखे पाटील यांच्यावर आरोप केले. लंके यांच्या मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि मते खाण्यासाठीच हे उमेदवार आणले गेल्याचा आरोप करण्यात आला. काही हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांनीही अशरफी यांच्याविरोधात वक्तव्य केली.
‘एमआयएम’ला मत म्हणजे भाजपला मदत असा मुस्लिमांमध्ये पक्का समज
यासोबतच मुस्लिम समाजातूनही दबाव वाढला असल्याचे सांगण्यात येत होते. ‘एमआयएम’ला मत म्हणजे भाजपला मदत असा पक्का समज आता मुस्लिमांमध्ये झाला आहे. त्यामुळे नगरमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत यासंबंधी अशरफी आणि ‘एमआयएम’चे नेते खासदार इम्प्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली. सोशल मीडियातून आणि प्रत्यक्ष बैठकांमधूनही अशरफी यांच्या उमेदवारीला हरकत घेण्यात येत होती. छत्रपती संभाजीनगर येथील मुस्लिम पदाधिकाऱ्यांमार्फतही खासदार जलील यांच्यापर्यंत निरोप पोहोचविल्याचे सांगण्यात येते.
अशरफी यांच्यावर बरीच टीका
अशरफी यांच्यावर विविध आरोपही केले जात होते. सर्वच बाजूंनी टीका होऊ लागल्याने आणि समाजाच्या दबावामुळे अशरफी यांना माघार घ्यावी लागली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारात ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यासंबंधी त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही. त्यानंतर ते कोणालाही न भेटता निघून गेले. प्रसारमाध्यमांनी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणि नंतर माघारीसाठीही वरिष्ठ पातळीवरूनच सूचना आली होती, असे सांगण्यात येते.
भाजप विरोधी मते विभागून भाजपलाच फायदा होतोय
‘एमआयएम’ची महाराष्ट्रात एंट्री झाली, त्यावेळी मुस्लिमांचा बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला होता. मात्र, आता एमआयएममुळे भाजप विरोधी मते विभागली जाऊन भाजपचाच फायदा होत असल्याचे समोर येऊ लागल्याने मुस्लिमांमध्ये बऱ्यापैकी जागृती झाल्याचे बोलले जात आहे. अशीच जागृती आणि एकजूट नगरच्या मुस्लिमांमध्ये पहायला मिळाली. गेल्या काही काळापासून नगरमध्ये घडत असलेल्या विविध घटनांतून ही एकी झाल्याचे आढळून येते. त्यामुळेच भाजपला मदत होऊ नये, यासाठी समाजाने पुढाकार घेत ‘एमआयएम’ला माघार घ्यायला लावल्याचे दिसून येते.
यावरून लंके यांच्या समर्थकांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांच्याकडूनही अशरफी यांच्या उमेदवारीवर टीका होत होती. आता अशरफी यांच्या माघारीचा लंके यांना किती फायदा होणार हेही स्पष्ट होईल.