Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Loksabha Election Result: कोण आहेत किशोरीलाल शर्मा? ज्यांनी स्मृती इराणींना पराभूत करुन घेतला राहुल गांधींच्या अपमानाचा बदला

10

अमेठी : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा (के.एल.शर्मा) यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात मोठं मताधिक्य मिळवलं आहे. १ लाख ६७ हजारांची आघाडी घेऊन त्यांनी अमेठी मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे आता किशोरीलाल शर्मा यांचे गांधी घराण्याशी असलेले संबंध या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

गांधी घराण्याचे जवळचे विश्वासू के एल शर्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत शर्मा यांना ५ लाख ३९ हजार ४५० मतं मिळाली आहेत. तर स्मृती इराणी यांना ३ लाख ७२ हजार ३२ मतं मिळाली. अटीतटीच्या लढाईतील शर्मा यांची आघाडी लक्षवेधी ठरली आहे. मूळचे पंजाबच्या लुधियाना येथील किशोरीलाल शर्मा यांनी ४० वर्षांपूर्वी राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघ समन्वयक म्हणून राजकारणात पदार्पण केले. यापूर्वी त्यांनी नेहरू युवा केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले होते.

२००४ पासून, शर्मा यांनी सोनिया गांधींचे प्रतिनिधी म्हणून रायबरेली प्रदेशात निवडणूकीची जबाबदारी चोखपणे सांभाळली. १९८३ मध्ये त्यांनी राजीव गांधींसोबत रायबरेली आणि अमेठीमध्ये पाऊल ठेवले. राजीव यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट ते कुटुंबाचा भाग बनले. गांधी घराण्याने या प्रदेशातून निवडणूक लढवणे बंद केल्यानंतरही शर्मा यांनी काँग्रेस पक्षाच्या खासदारासाठी काम करणे सुरूच ठेवले.

राजकीय घडामोडींचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचं वारंवार रायबरेली आणि अमेठीला येणं जाणं असायचं. जेव्हा सोनिया गांधींनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हा शर्मा यांनी त्यांच्या प्रचाराला भक्कम पाठिंबा दिला. नंतर जेव्हा सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली आणि रायबरेलीत गेल्या तेव्हा शर्मा यांनी दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. कालांतराने अनेकांनी काँग्रेस सोडली तरीही शर्मा यांची पक्षाशी निष्ठा कायम राहिली. त्यांनी कधी बिहारचे प्रभारी पद भूषवले, तर कधी पंजाब समितीचे सदस्य आणि एआयसीसीच्या सदस्यपदाची जबाबदारी सुद्धा चोखपणे वठवली. बहुतांश वेळा निवडणुक प्रचाराची धुरा सुद्धा त्यांच्याकडेच राहिली. परिणामी गांधी घराण्याशी निष्ठा ठेवल्याबद्दल त्यांना त्याचे फळ मिळाले आहे.
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे
रायबरेलीत सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत शर्मा यांनी त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक ती मदत केली. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे सोनियांच्या महत्त्वपूर्ण विजयात मोलाचा वाटा होता. काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी नमूद केले की, “राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सरकारी योजनांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेसच्या लोकांना तैनात केले होते. त्यानंतर किशोरीलाल यांना अमेठीत समन्वयक बनवण्यात आले. त्यांचे रायबरेली आणि अमेठीशी ४० वर्ष जुने नाते आहे. प्रत्येक घरात लोक त्यांना ओळखतात. शर्मा यांचे समर्पण आणि गांधी घराण्याशी असलेले संबंध या बाबींनी त्यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रदेशाच्या राजकारणातील त्यांचा सहभाग अनेक दशकांपर्यंत आहे, ज्यामुळे ते रायबरेली आणि अमेठीमध्ये एक परिचित आणि विश्वासू व्यक्ती बनले. मतमोजणी सुरू असताना, के एल शर्मा यांच्या आघाडीने त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव आणि काँग्रेस पक्ष आणि या प्रदेशातील गांधी घराण्याच्या वारशासाठी दीर्घकाळची बांधिलकी दर्शवली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.