Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विद्यार्थ्यांकडून दिर्घोत्तरी प्रश्नांची लघुत्तरी उत्तरे, पास तरी कसं करायचं? प्राध्यापकांना पडला प्रश्न

9

मुंबई : करोनाकाळात बहुपर्यायी प्रश्नांची गोडी लागलेल्या विद्यार्थ्यांची दिर्घोत्तरी प्रश्न सोडविताना तारांबळ उडत आहे. विद्यार्थ्यांकडून या प्रश्नांना लघुत्तरे लिहिली जात आहेत. त्यातही विद्यार्थी पूर्ण पेपर सोडविताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करायचे, हा प्रश्न प्राध्यापकांसमोर उभा राहिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच लागलेल्या तृतीय वर्ष बी. ए. अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राचा केवळ ३३ टक्के निकाल लागला. विद्यापीठाच्या अनेक वर्षांच्या इतिहासात इतका कमी निकाल यंदा लागल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांकडून पूर्ण पेपर सोडविला जात नसल्याचे कारण यामागे सांगितले जाते.

करोनानंतर शिक्षण ऑनलाइन झाले, विद्यार्थीही ऑनलाइन शिक्षणात दंग झाले. मात्र करोनाची लाट ओसरल्यानंतरही विद्यार्थ्यांना लागलेली ऑनलाइन शिक्षणाची सवय कायम आहे. करोनात बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी तीन वर्षांत प्रथमच विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेत दिर्घोत्तरी प्रश्नांना सामोरे गेले. मात्र पहिल्याच परीक्षेत त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसले.

विद्यार्थ्याने मराठीच्या १० गुणांच्या प्रश्नाचे किमान तीन पाने उत्तर लिहिणे अपेक्षित असते. मात्र विद्यार्थी दीड पानापर्यंतच पोहोचतात. १५ गुणांच्या प्रश्नाचे चार ते पाच पाने उत्तर लिहिणे अपेक्षित असताना कशीबशी तीन पाने लिहिली जातात. त्यातही मुद्देसूद उत्तरांचा अभाव असतो. त्यातून विद्यार्थ्यांना गुण मिळत नाहीत.

५० टक्के विद्यार्थी १०० गुणांपैकी केवळ ६० गुणांच्या प्रश्नांचीच उत्तरे लिहू शकतात. विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा वेग कमी असल्याने पेपर पूर्ण होत नाही, अशी परिस्थिती मराठीच्या एका प्राध्यापकाने मांडली. कॉलेजमधील मराठीच्या २८ विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच विद्यार्थी सर्व विषयांत उत्तीर्ण होऊ शकल्याचे या प्राध्यापकाने सांगितले.

विद्यार्थ्यांनी ३२ पानांच्या उत्तरपत्रिकेपैकी २५ ते ३० पाने उत्तरे लिहावीत, असे अपेक्षित असते. मुले उत्तरपत्रिकेची कशीबशी १५ पाने लिहित आहेत. प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र, संशोधन पद्धती अशा विषयांत समर्पक उदाहरणे अपेक्षित असतात. मात्र विद्यार्थ्यांकडून ती लिहिली जात नाहीत. त्यांना संकल्पना स्पष्ट नाहीत. त्यातून १० गुणांच्या प्रश्नासाठी परीक्षक कसेबसे दोन ते तीन गुण देऊ शकतात, अशी माहिती अर्थशास्त्राच्या एका प्राध्यापकाने दिली.

विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव नाही. त्यांना कसेबसे उत्तीर्ण केले आहे. १० गुणांच्या प्रश्नाला काही विद्यार्थ्यांनी केवळ अर्धे ते एक पान उत्तर लिहिले, असे इतिहासाच्या प्राध्यापकाने सांगितले.

वाढीव गुणांनंतरही निकाल कमी

उत्तरपत्रिका तपासताना अनेकांनी सढळ हस्ते गुण दिल्याचे काही प्राध्यापकांनी नमूद केले. विद्यापीठाकडूनही विद्यार्थी नापास होऊ नयेत, यासाठी १० गुण वाढीव देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. तरीही निकाल ३३ टक्केच लागू शकला.

विद्यार्थी कुठे कमी पडतात?

– लिखाणाची सवय मोडली

– केवळ परीक्षालक्षी अभ्यासावर भर

– अवांतर वाचन नाही. स्पष्टीकरण लिहिता येत नाही.

– स्वतःच्या नोट्स काढण्यावर भर नाही. शिक्षकांच्या नोट्सवरून परीक्षेपुरता अभ्यास

– परीक्षांच्या अनुषंगानेच उत्तरांचे पाठांतर. त्यातून वेगळ्या प्रश्नाला तारांबळ उडते.

– उत्तीर्ण केले जाते ही मानसिकता

– केवळ प्रमाणपत्र मिळवणे एवढाच शिक्षणाचा उद्देश

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.