
Tej Police Times
सहजे स्वसुखाचेनि अपारे। सुखावलेनि अंतरे।
रचिला म्हणऊनि बहिरे। पाऊल न घाली।। ज्ञा. १०६
शब्दातील भाव हृदयंगम झाला पाहिजे. आतल्या सुखाला सहज सुख, असं म्हणतात. ते अपार असल्यामुळं अंतर सुखावलं. बाहेर जाणारं अंत:करण सुखावल्यामुळं बाहेर जाणं विसरलं. ओवी खूप सुंदर आहे असं वाटण्यापेक्षा, त्यातील भावापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. आत सुखानं तो समृद्ध आहे. माऊलीनं प्रारंभ केलेल्या विचारसरणीत आल्यामुळं वैचारिक श्रीमंती लाभली. सकाळ आणि संध्याकाळ जागृतीचे आणि भक्तीचे संस्कार लाभले. भरलेल्या पोटानं आणि समाधानी चित्तानं वारकरी शांत झोपेचा आस्वाद घेतो. वैचारिक सुख आगळंवेगळं असतं. जीवन समजणाऱ्यालाच ते मिळतं.
हा जो वारकरी आहे, त्याची ही जीवनशैली आहे. बऱ्याच लोकांना ‘महाराज’ माहीत आहेत; पण वारकरी माहीत नाहीत. पंथ आणि संत हे जुन्या काळातील आहेत, म्हणून विचारणीय नाहीत, असा अविचार करू नये. व्यापकता आणि व्यापक ज्ञान यांचा विषय आजही लोकांना माहीत नाही. भौतिक सुविधायुक्त जीवन असणं आणि आतून श्रीमंत असणं, यात खूप अंतर आहे. माऊलींची एक ओवी आहे, जी जीवनावर भाष्य करते,
बाहेरी कर्मे क्षाळला। भीतरी ज्ञाने उजळला।
इंही दोही परी आला। पाखाळ एका। ज्ञा. १३-४६४
वर्तमानकाळात असं दिसत नाही. काहींचं कर्म चांगलं आहे, ज्ञान अंधश्रद्धात्मक आहे. काही भौतिक ज्ञानी आहेत; पण कर्म चांगलं नसल्यामुळं अंतरात्मा दु:खी आहे. काही ज्ञानी कर्मच करीत नाहीत, तर कर्मनिष्ठ ज्ञानाला तुच्छ लेखतात. घर आतून स्वच्छ असावं आणि बाहेरून देखणंही असावं; समाधान वाटतं. बाहेरून कर्म चांगली असावीत आणि अंतर ज्ञानानं उजळावं, याला जीवन म्हणतात. मूळ वारकऱ्यांना हे जीवन मिळतं. आपल्या बुद्धीनं वारकऱ्याच्या आनंदाचा अंदाज घेता येत नसतो. सामान्य माणसं वेगळी अन् अंतरात सुखावलेला वारकरी वेगळा. परमार्थात अनेक उद्बोधन, प्रबोधन करणारे महाराज आहेत. स्वत:ला ज्ञानी समजणारेही आहेत; परंतु अंतरंग वारकरी भेटणं आणि कळणं कठीण आहे.
बाह्य प्रवासाबरोबर आतला प्रवासही वारकरी करीत असतो. या प्रवासात माऊलींच्या अभंगाची माया मिळते. नामदेव महाराजांचे अभंग प्रेम देतात. अनाथांना नाथ आधार देतात. तुकाराम महाराज धैर्य बांधून ठेवतात. निळोबारायांच्या गौळणी संवाद साधतात. दर पंधरा दिवसांनी देवाची भेट होते. पुढच्या पंधरा दिवसांत देव ज्यांनी दाखवला, त्या माऊलींची भेट होते. देव आणि संत यांच्यात जो असतो, तो वारकरी होय. या वारकऱ्यापासून मृत्यू सावध असतो. दु:ख जवळ येत नाही. वारकऱ्यांच्या आकाराला विकार घाबरतात. तुकोबारायांच्या शब्दात सांगावंसं वाटतं,
संसार तो तयाचा दास। मोक्ष तो पाहतसे वास।
रिद्धी सिद्धी देशवटा त्रास। न शिवती यास वैष्णव जन।।
जन्ममृत्यु स्वप्नासारिखे। आप त्या न दिसे पारखे।
तुका म्हणे अखंडित सुखे। वाणी वदे मुखे प्रेमामृताची।। नाट : गा. ४०५४
याला वारकरी म्हणतात. ‘पंढरीचे वारकरी। ते आधिकारी मोक्षांचे।’ असा यांचा अधिकार आहे. वारकरी होऊन पंढरपूरला गेलो, तर आपल्याला ‘पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा’ दिसेल. येऱ्हवी आपण पाहतच आहोत. आपल्या योग्यतेप्रमाणं आपल्याला दिसत आहे. परिवर्तनासाठी दिंडीसह वारी आहे. आपल्यात परिवर्तन व्हावं, ही भावना ठेवून संतसहवासात दिंडीसह वारी घडावी.
Recover your password.
A password will be e-mailed to you.